वीरच्या शिवशंभो कावडी मंडळाचा ऐतिहासिक विक्रम.
महाराष्ट्रातील एकमेव कावडीने १२ ज्योतिर्लिंग, अष्टविनायक आणि दोन धाम केदारनाथ व बद्रीनाथ यात्रा पूर्ण केली.

पुणे प्रतिनिधी:-
पुणे जिल्ह्यातील वीर गावातील श्री शिवशंभो कावड मंडळाने एक अद्वितीय आणि प्रेरणादायी इतिहास घडवला आहे. मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या महादेवाच्या पवित्र कावडीने देशभरातील धार्मिक स्थळांचा अत्यंत कठीण आणि श्रद्धापूर्ण प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
या कावड यात्रेत मंडळाने हिमालयातील पवित्र श्री केदारनाथ व बद्रीनाथ असे दोन धामाचे दर्शन घेतले असून, या आधी संपूर्ण भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचे तसेच महाराष्ट्रातील अष्टविनायकांची यात्रा पूर्ण केली आहे. ही यात्रा अत्यंत कष्टप्रद, वेळखाऊ आणि श्रद्धेची कसोटी पाहणारी मानली जाते.
विशेष म्हणजे, १२ ज्योतिर्लिंग + अष्टविनायक + केदारनाथ अशी संपूर्ण यात्रा कावडीच्या माध्यमातून पूर्ण करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ ठरले आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे श्री शिवशंभो कावड मंडळाने धार्मिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असून, संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
मंडळातील सर्व शिवभक्तांच्या अथक प्रयत्न, निष्ठा आणि महादेवावरील अढळ श्रद्धेमुळे हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला. गावकऱ्यांनी व भक्तांनी या यशाबद्दल मंडळाचे जोरदार स्वागत करून त्यांचा गौरव केला.









