समृद्ध शेतकरी, सुदृढ शेती आणि निरोगी समाज’ हीच विकसित भारताची गुरुकिल्ली: रामकृष्ण वेताळ

नीरा (पुरंदर) :’समृद्ध शेतकरी, सुदृढ शेती आणि निरोगी समाज’ या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास विकसित भारताची उभारणी निश्चित होईल. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने रासायनिक शेतीला फाटा देऊन प्राकृतिक शेतीचा स्वीकार करावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, पुणे (दक्षिण) यांच्या वतीने रविवारी (दि. २८) नीरा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ‘प्राकृतिक शेती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण वेताळ होते.
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण
कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाने झाली. उपस्थितांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन अत्यंत उत्सुकतेने ऐकले. त्यानंतर प्राकृतिक शेतीचे महत्त्व पटवून देणाऱ्या तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते
आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांतील प्रगतशील व आदर्श शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या कार्यशाळेस माजी आमदार अशोक टेकवडे, तानाजीराव थोरात, अविनाश मोठे, सचिन लंबाते, भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, प्रदेश सचिव मनोज कासवा, सरचिटणीस बाळासाहेब गरुड आणि किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे,सरचिटणीस वैभव आटोळे, उपाध्यक्ष महादेव शेंडकर, उपाध्यक्ष महेशजी जाधव,पुरंदर मंडलाध्यक्ष संजय निगडे,जिल्हा उपाध्यक्ष,योगेंद्र माने, अमोल यादव, माणिकराव चोरमले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे यांनी केले, तर महादेव शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले. दीनानाथ मारणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.










